
कोकणातील एक महत्त्वाचे मुस्लिम पीराचे स्थान म्हणजे केळशीच्या जवळ उटंबर टेकडीवर असलेला याकूतबाबा दर्गा. सिंध मधील हैदराबादहून हे बाबा १६१८ साली बाणकोट बंदराशी बोटीने येऊन पोहोचले असं सांगितलं जाते. त्यांच्याबरोबरच सोबत सोलीस खान नावाचा एक युवकही आला होता. स्थानिक होडीवाल्याने नदी पार करायला बाबांना नकार दिला तेव्हा दुसऱ्या एका माणसाने बाबांचे होडीभाडे भरले आणि पुढे त्याचा प्रचंड उत्कर्ष झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. हा ३८६ वर्षे जुना दर्गा हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्लाह दर्गा या नावाने ओळखला जातो. दरवर्षी ६ डिसेंबरच्या दिवशी इथं उरूस भरतो ज्याला मुस्लिमांबरोबरच हिंदू व इतर धर्मांचे भाविकही येत असतात.

दाभोळवर (१६६६ च्या सुमारास) स्वारी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी याकूतबाबांची भेट आणि मार्गदर्शन घेतले आणि त्यांना ६५३ एकर जमीन दर्ग्याच्या आसपास दिली असे दर्ग्यातील लोक सांगतात. काहींनी तर याकूतबाबांना छत्रपती शिवरायांचे गुरुपद बहाल करून टाकले आहे. ते मात्र अनैतिहासिक आहे. ९८ कलमी बखरीत याकूत बाबांचा उल्लेख आहे परंतु हा संदर्भ शिवकालीन नाही. ही अतिशय साधी पण नेटकी दगडी वास्तू नक्की पाहावी अशी आहे. केळशीच्या परिसरात श्री महालक्ष्मी मंदिर, वाळूची टेकडी, भारजा नदीचा परिसर, सिद्धिविनायक मंदिर अशी अनेक ठिकाणे पाहण्याजोगी आहेत. उटंबर येथील बेलेश्वर मंदिरही आवर्जून पाहावे. दर्या फिरस्तीच्या माध्यमातून कोकण किनाऱ्याची चित्रभ्रमंती करणे आणि जगभर पसरलेल्या कोकण प्रेमींना हा प्रवास इंटरनेट द्वारे घडवणे हा आमचा प्रयत्न आहे. तेव्हा आमच्या ब्लॉगला नेहमी भेट देत राहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांना, स्नेह्यांनाही सांगा ही अगत्याची विनंती.