आंग्रे घराण्याची विशेषतः स्त्रियांची भगवंत विठ्ठलावर विशेष भक्ती. इसवीसन 1778 मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांची सून नर्मदाबाई आंग्रे यांनी वरसोली येथे विठ्ठल रखुमाई आणि गरुडाची स्थापना केली. तेव्हापासून इथं उत्सव आणि श्री विठ्ठलाची भक्ती यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आंग्रे घराण्याचे आजचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे सुद्धा अतिशय भक्तीभावाने येथे दरवर्षी पूजा अर्चना करतात

दरवर्षी कार्तिक वद्य एकादशी पासून अमावास्येपर्यंत इथं विठ्ठलाचा उत्सव मोठ्या जोमाने साजरा केला जातो. 1840 साली इथं मंदिराच्या शिखराचे रंगकाम सुरु असताना दुर्घटना घडली आणि तेव्हाच हत्तीखान्यातही आग लागली व मोठी दुर्घटना घडली. (संदर्भ – आंग्रेकालीन अष्टागर – शां वि आवळस्कर) ही घटना विसरून लोकांनी पुन्हा मांगल्यपूर्ण वातावरणात एकत्र होऊन आनंद अनुभवावा म्हणून हा उत्सव सुरु झाला आणि आज तो 200 वर्षांहून अधिक काळ अव्याहत सुरु आहे अशी मान्यता आहे. अपवाद फक्त कोविड च्या वर्षीचा जेव्हा केवळ दर्शनासाठी मंदिर खुले होते

गावोगावी भरणारे हे उत्सव आणि यात्रा यांचे महत्व केवळ धर्म आणि कर्मकांडापुरते मर्यादित नाही. त्यांची स्वतःची अशी एक अर्थव्यवस्था आणि उलाढाल आहे. अनेक पिढ्यांच्या आठवणींशी हे उत्सव जोडले गेलेले आहेत. देशभर, जगभर विखुरलेले आप्तजन अशा उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येतात आणि आनंदाचे, उत्साहाचे क्षण एकत्र अनुभवतात हे अतिशय महत्वाचे आहे.

आज गर्भगृहात ज्या विठ्ठल रखुमाईची पूजा केली जाते ती मूर्ती नवीन आहे. पण मंदिराच्या सभामंडपातच जुन्या सुबक आणि देखण्या मूर्तीला जतन करण्यात आले आहे. 17व्या शतकापासून ब्रिटिश काळापर्यंत कोकणात एक विशिष्ट वास्तुरचना पद्धती विकसित झाली. म. श्री. माटेंसारख्या पुरातत्वविदांनी या मराठेशाही शैलीचे विश्लेषण केले आहे. त्यात पेशवेकालीन मंदिर स्थापत्यही उठून दिसते. भारतभर उत्तर मध्ययुगीन मंदिर स्थापत्य शैली विकसित होत गेली त्याची दखल जॉर्ज मिशेल सारख्या आंतरराष्ट्रीय कला इतिहासकारांनी सुद्धा घेतली आहे.

आषाढी एकादशीला इथं भजन, कीर्तन, काकड आरती होत असते. मंदिराची रचना पंढरपूर येथील मंदिराप्रमाणे असून सभामंडप शयन कक्ष, पालखी कक्ष आणि गरुड खांब यांनी सजलेला आहे. समोरच दीपमाळ, तुळशी वृंदावन असून गरुडाचे शिखर असलेले मंदिरही आहे. २४४ वर्षे जुने असलेल्या या मंदिराला विठ्ठल भक्त प्रति पंढरपूर म्हणूनही ओळखतात.
माझ माहेर वरसोली. शाळेत असताना आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात येत असे देवळापर्यंत. मंदिराच काम १५ वर्षापूर्वीच आहे, जुन्या मंदिराचे फोटो देवळात लावले आहेत.